बारामती नगरपालिकेची अतिक्रमणांवर कारवाई   

बारामती, (प्रतिनिधी) : बारामती नगरपालिकेने शहरातील अतिक्रमणावर धडक कारवाई करत हातगाडी, पथारी धारकांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. या मोहिमेअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या व टपर्‍या परत देण्यात येणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना नगरपालिकेने पूर्वीच दिली होती. या कारवाईविषयी माहिती देताना नगरपालिकेचे मुख्य अधिकारी पंकज भुसे यांनी खुलासा केला की, संबंधित अतिक्रमण काढताना पूर्वसूचना देण्यात आली होती.
 
नोटिशीच्या नावावर नगरपालिकेने चक्क बनाव करीत विना नाव असलेली नोटीस काढली होती ज्यामुळे सदरच्या पथारी आणि हात गाडी चालकांचा संभ्रम झाला, यात दुसरीकडे नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारत कारवाई सुरूच ठेवली. या कारवाईदरम्यान शहरातील पथारी व हातगाडी चालकांची अधिकृत समिती पुढे आली व त्यांनी विरोध केला. त्यावेळी पोलिसांनी संबंधित समिती सदस्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत नोटीस देऊन त्यांना सोडून दिले.
 
दरम्यान, शहरात ’राजा सांगे आणि प्रशासन हले’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गोरगरीब पथारी व हातगाडी चालकांचे कोणतेही संरक्षण नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भिगवण रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेल्या टपर्‍यांना देखील कोणताही परवाना नसतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने, नगरपालिका दुहेरी निकष लावत असल्याचा आरोप होत आहे. मंडई परिसरातील गाळे पाडल्यानंतर त्याठिकाणी पत्रा शेड उभारून गाळेधारकांचे पुर्नवसन करण्यात आले. मात्र, हे शेड कोणी उभारले, याची माहिती नगरपालिकेकडे नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे, तीही अतिक्रमणाचीच स्वरूपात येते का, असा सवाल उपस्थित होतो आहे. या पार्श्वभूमीवर, कारवाई करताना सर्व घटकांवर समान न्याय लावण्यात येतो आहे का? की निवडक कारवाई होत आहे? असा प्रश्न बारामतीकर विचारू लागले आहेत. नगरपालिका आम्हाला अंधारात ठेवुन बेकायदा कारवाई करीत आहे, त्यामुळे पथारी हातगाडी चालक संघटनेच्या वतीने बारामतीत बंद पुकारून तीव्र आंदोलन करण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. 
 

Related Articles